नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदेडच्या माता साहिब कौर गुरुद्वारा परिसरात दर्शनासाठी आले असताना एका व्यक्तीने सुरक्षा व्यवस्था भेदून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोराला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीरसिंग बादल हे वैयक्तिक भेटीसाठी नांदेड येथील गुरुद्वारात आले होते. त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. दर्शन घेऊन बाहेर पडत असताना अचानक एका निहंग व्यक्तीने त्यांच्यावर कृपाणने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत बादल यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणात पोलिसांनी ६२ वर्षीय जसपालसिंग याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. तो पुणे येथील रहिवासी असून पुणे न्यायालयात वकिली करत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो नांदेडच्या मुगट येथील माता साहिब गुरुद्वारात सेवा देत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून माहिती
सुखबीरसिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. आरोपीला तत्काळ ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली असून, हल्ल्यामागील उद्देशाचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत सुखबीर बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेनंतर गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे.
सुखबीर बादल यांच्यावर यापूर्वीही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. ४ डिसेंबर २०२४ रोजी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराबाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळीही सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला होता. आता नांदेडमध्ये पुन्हा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.















Discussion about this post