भंडारा : लग्नाच्या आनंदोत्सवानंतर आपल्या गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाने घाला घातला. भरधाव अज्ञात ट्रकने मारुती व्हॅनला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार महिलांसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे काल रात्री हा भीषण अपघात घडला. कोंढा कोसरा येथून लग्न समारंभ आटोपून वऱ्हाड मारुती ओमनी व्हॅनने पवनीच्या दिशेने परतत असताना भरधाव अज्ञात ट्रकने व्हॅनला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा टायर फुटून वाहनाचा चक्काचूर झाला आणि वाहनातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींच्या आक्रोश आणि किंकाळ्या ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.















Discussion about this post