मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी आज (२२ जुलै) दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. याचबरोबर कर्जमाफीची रक्कमही पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
मंत्रालयात दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही घोषणा करण्यात येत असल्याचे सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले.
दोनदा पुढे ढकलली होती कर्जमाफी
राज्य सरकारने यापूर्वी ३० जूनपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर ५ जुलैची तारीखही चर्चेत होती. मात्र पात्रतेच्या निकषांमध्ये बदल, लाभार्थ्यांची पडताळणी आणि आर्थिक तरतुदीची प्रक्रिया सुरू असल्याने निर्णयाला विलंब झाला.पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली. त्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ३० जुलैपूर्वी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असे स्पष्ट केले होते.
कोणाला मिळणार कर्जमाफी?
शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. आर्थिकदृष्ट्या गरजू आणि निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची गरज नाही
या योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. संबंधित बँका आणि प्रशासनाकडील उपलब्ध माहितीनुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
यादी कुठे पाहता येणार?
कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी संबंधित बँका, ग्रामपंचायती तसेच अधिकृत शासकीय माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकरी आपल्या नावाची खात्री करून लाभाचा तपशील पाहू शकतील.
खरीप हंगामासाठी मोठा दिलासा
ऐन खरीप हंगामात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होत असल्याने पात्र शेतकऱ्यांची कर्जखाती नियमित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्यांना नव्याने पीककर्ज घेणेही सुलभ होणार असून, या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.















Discussion about this post