राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून उष्णतेसह अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे. 15 एप्रिल 2026 रोजी भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी गंभीर इशारा दिला आहे. एकीकडे तापमान झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांसाठी परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
उष्णतेची लाट तीव्र, अनेक जिल्ह्यांत अलर्ट :
हवामान तज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. नागपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर अकोल्यात तब्बल 44 अंशांपर्यंत पारा पोहोचला. पुणे आणि सोलापूरमध्येही उष्णतेच्या लाटेचा परिणाम दिसून आला असून दोन्ही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पुढील आठवडाभर येथे उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. प्रशासनाने नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले असून उष्माघात टाळण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नंदुरबारमध्येही तापमान 42 अंशांवर गेल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उष्णतेसोबतच राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 15 आणि 16 एप्रिलसाठी ऑरेंज अलर्ट, तर 17 एप्रिलसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून अचानक हवामान बदल होऊ शकतो. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा घटनांची शक्यता वर्तवण्यात येत आहे.















Discussion about this post