जळगाव । एटीएम केंद्रावर अनोळखी व्यक्तीकडून मदत घेणे एका सेवानिवृत्त वृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. सेवानिवृत्त वृद्धाचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्यांच्या खात्यातून तब्बल २ लाख ३१ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
रायपूर (ता. जळगाव) येथील रहिवासी देविदास रामा कोळी (वय ६१), जे जलसंपदा विभागातून निवृत्त झाले आहेत, ते २६ मार्च रोजी दुपारी राजकमल टॉकीज परिसरातील स्टेट बँकेच्या (SBI) एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. कोळी यांनी एटीएममधून २० हजार रुपये काढले. मात्र, याच वेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका अज्ञात तरुणाने “तुमचे कार्ड व्यवस्थित चालत नाहीये, मला दाखवा” अशा काहीशा बहाण्याने त्यांच्याशी संवाद साधला.
संबंधित भामट्याने कोळी यांच्याकडून कार्ड हातामध्ये घेतले आणि अत्यंत चपळाईने ते बदलून दुसरेच एक डमी कार्ड त्यांच्या हातात टेकवले. कोळी यांना या हातचलाखीचा पुसटसा पत्ताही लागला नाही.३० मार्च रोजी कोळी यांना पैशांची गरज भासल्याने ते पुन्हा बँकेत गेले. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर त्यांना धक्का बसला. बँकेचे स्टेटमेंट काढले असता, २६ ते ३० मार्च या अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत भामट्याने वेगवेगळ्या एटीएम केंद्रांतून २ लाख ३१ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे समोर आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कोळी यांनी आपल्या जवळील एटीएम कार्ड बारकाईने तपासले. तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण त्या कार्डवर ‘अनूपकुमार श्रीवास्तव’ असे नाव छापलेले होते. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटताच त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांकडून तपास सुरू
जिल्हापेठ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता राजकमल टॉकीज परिसरातील आणि ज्या एटीएममधून पैसे काढले गेले, तिथल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.















Discussion about this post