मुंबई । पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपून गेलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्या भागांमध्ये पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी अधिकारी थेट शेताच्या बांधावर जाऊन पिकांचे सर्वेक्षण करणार आहेत. त्यानंतर नियमांनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात प्रशासन आणि मुख्य सचिवांना आवश्यक आदेश देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पावसाअभावी ज्या भागांमध्ये पिके करपली आहेत, त्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्वेक्षणासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे काम करणार आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची परिस्थिती आणि नुकसानीची पाहणी केली जाणार असून, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
नुकसानभरपाईची प्रक्रिया होणार
पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी उभी पिके पूर्णपणे करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सर्वेक्षणामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.बावनकुळे यांनी सांगितले की, सर्वेक्षणानंतर नुकसानीची स्थिती स्पष्ट होईल आणि त्यानुसार नियमाप्रमाणे आवश्यक ती नुकसानभरपाई देण्यात येईल. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा निर्माण झाली आहे.

प्रमाणपत्र वाटपावरही बावनकुळेंची प्रतिक्रिया
दरम्यान, मराठवाड्यात सुरू असलेल्या प्रमाणपत्र वाटपाच्या मुद्द्यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. प्रमाणपत्र वाटपासाठी यापूर्वीही शासनाच्या पुढाकारातून कॅम्प आयोजित करण्यात आले होते. शासनाच्या नियमावलीनुसार अशा प्रकारचे कॅम्प घेणे हे सरकारच्या धोरणाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.















Discussion about this post