मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी उपचार आणि पाणी घेण्यासही नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. अशा परिस्थितीतही जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम असून, सरकारकडून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सरकारने वेळीच मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला असता, तर आंदोलनाची वेळ आलीच नसती, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. २९ जून रोजीच सरकारला आंदोलनाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याचा दावा त्यांनी केला.

आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून होत असलेल्या विलंबामागे मराठा समाजाबाबतचा आकस असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला. सरकारच्या भूमिकेमुळे समाजामध्ये असंतोष वाढत असून, परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, मराठा आंदोलन दडपण्यासाठी पडद्यामागे प्रयत्न सुरू असल्याचाही दावा जरांगे पाटील यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. छत्रपती संभाजीनगर येथे सत्ताधारी मंत्र्यांची बैठक झाल्याचा दावा करत, आंदोलन रोखण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटले. मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी काही जणांकडून ते हिंसक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मुंबईच्या दिशेने जाताना पोलिसांकडून अडथळे निर्माण झाले, तरी आंदोलकांनी पोलिसांशी संघर्ष करू नये आणि कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईकडे जाताना पोलिसांकडून अडथळे निर्माण झाले तरी आंदोलकांनी संयम राखावा आणि कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचा आवाज बंद करणे हा सत्ताधाऱ्यांचा छुपा अजेंडा आहे. जर मुंबईला जाताना आपल्या बांधवांना अडवलं किंवा त्यांना मारहाण झाली तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद पाडा.
फडणवीसांवरही जरांगेंची टीका
देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर टीका करताना जरांगे पाटील यांनी आंदोलन दडपण्याचा विचार सत्ताधाऱ्यांच्या मनात असल्याचा दावा केला. विरोधकांवर तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय होत असेल तर सरकारला जाब विचारणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.















Discussion about this post