जळगाव ।राज्यात सध्या श्रावण सरींचा लपंडाव सुरू असून, काही भागांत जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता व्यक्त केली असून, या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहणार आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता सध्या कमी आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुरळक सरी
जळगाव जिल्ह्यात ढगांची दाटी कायम असली तरी जोरदार पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात पावसाची स्थिती तुरळक राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत हलक्या सरी कोसळू शकतात; मात्र मध्यम किंवा जोरदार पावसाची ठोस चिन्हे सध्या दिसत नाहीत.
कमी दाबाचे पट्टे जळगावपासून दूर
सध्या मध्य प्रदेशाच्या ईशान्य भागात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. मात्र, त्यांची दिशा ओडिशा, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशाकडे असल्याने त्याचा थेट परिणाम उत्तर महाराष्ट्रावर होण्याची शक्यता कमी आहे. उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात स्वतंत्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याशिवाय जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे.
सप्टेंबरमध्येही पावसाचा लपंडाव?
प्रशांत महासागरातील एल निनोच्या स्थितीचाही पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जळगावसह उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या आकाशात ढगांची दाटी असली तरी प्रत्यक्षात दमदार पावसासाठी जळगावकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.















Discussion about this post