मुंबई/जळगाव । राज्यात सध्या काही भागांत पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही ठिकाणी जोरदार सरी सुरू आहेत. अशातच हवामान खात्याने आज राज्यातील पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, जळगाव, धुळे, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागांत पुन्हा ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळणार आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत हे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आज अधिक ठळक होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीवर होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काळात राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.















Discussion about this post