नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून खाद्यपदार्थ, बाहेरचे खाणे आणि वाहतूक खर्चापर्यंत विविध बाबींमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या मासिक बजेटवर मोठा परिणाम होत आहे. जुलै महिन्यात देशातील महागाई दर ४.४५ टक्क्यांवर पोहोचला असून, जूनमध्ये हा दर ४.३८ टक्के होता. आगामी ऑगस्ट महिन्यात सणासुदीचा काळ असल्याने महागाईचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
खाद्यपदार्थांच्या किमतीत ५.५२ टक्के वाढ
जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत ५.५२ टक्क्यांची वाढ झाली. असमान मान्सून आणि बदलत्या हवामानाचा परिणाम भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतींवर झाला आहे. कांदा, आले आणि लसूण यांच्या दरात वाढ झाली असून, अंडी, चिकन आणि खाद्यतेलाच्या किमतीतही तेजी दिसून आली.
महाराष्ट्रात नुकत्याच वाढलेल्या दूध दराचाही घरगुती खर्चावर परिणाम होत आहे. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या कुटुंबांच्या बजेटवर आणखी भार पडण्याची शक्यता आहे. केवळ घरगुती वस्तूच नव्हे, तर बाहेर खाणे आणि राहण्याचा खर्चही वाढला आहे. रेस्टॉरंट आणि अकोमोडेशन क्षेत्रातील महागाईचा दर जुलैमध्ये ७.७२ टक्क्यांवर पोहोचला. जूनमध्ये हा दर ६.९१ टक्के होता.कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचा परिणाम वाहतूक खर्चावरही होत आहे. दैनंदिन वापरातील विविध वस्तूंच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान, कोअर महागाई ३.८ ते ४.३ टक्क्यांच्या आसपास स्थिर राहिल्याने अर्थव्यवस्थेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, खाद्य महागाईचा दबाव कायम राहिल्यास आगामी काळात परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.बोफा सिक्युरिटीजने असमान पाऊस आणि अल-निनोचा धोका लक्षात घेता पुढील काळात खाद्य महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. महागाईचा दबाव वाढल्यास रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहा महिन्यांत व्याजदरात एकूण ५० बेसिस पॉइंट्सची वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांसह दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीवर नागरिकांचे विशेष लक्ष राहणार आहे.















Discussion about this post