चाळीसगाव | जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पाटबंधारे उपविभागाअंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या गिरणा मोठ्या प्रकल्पात आज, ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत तब्बल ९७.०६% इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सतत वाढ राहत असल्याने, आज दुपारी १.०० वाजता धरणाचे दरवाजे उघडून गिरणा नदीपात्रात १,००० ते २,००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
धरणात तब्बल १५ हजार क्युसेकने पाण्याची आवक
मा. कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या आदेशानुसार हे द्वार परिचलन करण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जवळपास १०,००० ते १५,००० क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक (येवा) सुरू आहे. आगामी काळात ही आवक अशीच वाढत राहिल्यास नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
पशुधन व शेतीचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन
पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठावरील सर्व नागरिकांना तातडीने सतर्क करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या ग्रामस्थांनी आपले पशुधन, गुरेढोरे, शेतातील विद्युत मोटार पंप आणि इतर महत्त्वाच्या चिजवस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सध्या नदीपात्रात विविध शासकीय विभागांची बांधकामे आणि विकासकामे सुरू आहेत. पूरपरिस्थितीमुळे कोणतेही आर्थिक किंवा जीवित नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांनी आपली यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य व साधने त्वरित सुरक्षित जागी हलवून घ्यावीत. तसेच, सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी २४ तास अलर्ट राहून योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.















Discussion about this post