नवी दिल्ली । नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने सुरू केलेल्या आंदोलनाला आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असून दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट दिल्लीतील जंतर-मंतर गाठून आंदोलकांची भेट घेतली.
मनोज जरांगे पाटील यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करत त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. यावेळी जंतर-मंतरवरून बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
‘पुन्हा लाठीचार्ज झाला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही’
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “शांततेच्या आंदोलनात मोठी ताकद असते हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहोत. सर्व देश आणि राज्य तुमच्यासोबत आहे. पण यापुढे जर आंदोलकांवर पुन्हा लाठीचार्ज झाला, तर केंद्र सरकार आणि त्यांच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” असा कडक इशारा त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, “आपल्या आणि आपल्या मायबापांच्या, गावकऱ्यांच्या मतांवर हे सत्तेत आले आहेत. आज हेच आपल्या लेकरा-बाळांवर उलटले आहेत. पण विद्यार्थ्यांना आणि गोरगरीब जनतेला सरकार उलथवून टाकण्याची ताकद त्यांच्यात आहे, याचा विसर सरकारने पडू देऊ नये. जंतर-मंतर ही आंदोलनाची हक्काची जागा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही जागा सोडू नये आणि शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवावा.”
विरोधी पक्षांची जंतर-मंतरवर धाव, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नीट पेपरफुटी प्रकरण आणि पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनीही अभिजीत दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
दुसरीकडे, राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थी आणि विरोधी पक्षांकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे.















Discussion about this post