नवी दिल्ली : देशभर गाजत असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह संसदेत या विषयावर संयुक्तपणे भूमिका मांडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाला भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. विद्यार्थी आंदोलन, परीक्षांतील कथित गैरव्यवहार आणि विरोधकांनी संसदेत मांडायची भूमिका यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनासह शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकावे
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या मागण्या ऐकण्याचे आवाहन सरकारला केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.विरोधी पक्षांकडून विद्यार्थी आंदोलन, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि संबंधित मुद्दे संसदेतही जोरदारपणे मांडले जाणार असल्याचे संकेत या बैठकीनंतर मिळाले आहेत. त्यामुळे आगामी अधिवेशनात हा विषय पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post