नवी दिल्ली : NEET परीक्षा घोटाळा आणि दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अखिलेश यादव म्हणाले, “आमच्या पक्षाच्या खासदारांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले आहे, तर बाहेर निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठीमार केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी त्यांना दडपण्याचे काम सरकार करत आहे.”
त्यांनी NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय देण्याची मागणी केली. तसेच आंदोलन करणाऱ्या तरुणांशी प्रशासनाने संयमाने आणि आदराने वागावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या आंदोलनाच्या तत्त्वांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. “स्वातंत्र्यलढ्यात आंदोलन करणाऱ्यांचे म्हणणे इंग्रजसुद्धा ऐकत होते. महात्मा गांधींनी जगाला शांततामय आंदोलनाचा मार्ग दाखवला. मात्र आजचे सरकार आंदोलकांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. अशी भूमिका कायम राहिली तर या सरकारला शेवटी अत्यंत अपमानास्पदरित्या सत्ता सोडावी लागेल,” असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला.
NEET आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post