वर्धा : समृद्धी महामार्गावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विरूळ इंटरचेंजजवळ भरधाव ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. धडकेनंतर कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर ट्रकला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून मुलीचे प्रवेशाचे काम पूर्ण करून नागपूरकडे परतणाऱ्या एका कुटुंबाची कार समृद्धी महामार्गावरून जात होती. दरम्यान, याच मार्गावर यापूर्वी इथेनॉलचा टँकर पलटी झाल्याने वाहतूक वळविण्यात आली होती. वाहतूक मंदावलेली असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कार ट्रकच्या खाली चिरडली गेली. त्यानंतर ट्रकला आग लागली. ट्रकमध्ये मिरचीची वाहतूक सुरू होती. या भीषण अपघातात कारमधील चालकासह चार जण आणि ट्रकमधील चालक व क्लिनर अशा एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठीही प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या.















Discussion about this post