पंढरपूर | आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असतानाच, दर्शन व्यवस्थेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंदिर प्रशासनातील समन्वयाच्या अभावाबाबत नाराजी व्यक्त केली असून, दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर प्रशासनाने सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीला दर्शनाची परवानगी दिली. मात्र, त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबीयांना व्हीआयपी दर्शन नाकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याउलट मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या सर्वांना दर्शनाची परवानगी देण्यात आल्याची चर्चा रंगली असून, भाविकांमध्ये वेगवेगळे निकष लावले जात असल्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मंदिर प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. अशा प्रकारच्या विसंगतीमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, रांगेत उभे राहण्यास माझी कोणतीही हरकत नाही. मात्र, मंत्री म्हणून विविध शासकीय जबाबदाऱ्या असल्यामुळे वेळेचे नियोजन करावे लागते. माझ्यासोबत आलेल्या सर्वांना प्रशासनाने दर्शनाची परवानगी दिली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
आषाढी एकादशी निमित्त व्हीआयपी दर्शन बंद असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असतानाच पहिल्याच दिवशी आजी-माजी मंत्र्यांच्या दर्शनाबाबत वेगवेगळे निकष लागू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर आणि दर्शन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, या प्रकरणाची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगली आहे.















Discussion about this post