राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होणार असल्याच्या चर्चांदरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना थेट एनडीएमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. तसेच, पवार यांनी २०१४ मध्ये एनडीएमध्ये प्रवेश केला असता तर त्यांचा राष्ट्रपतीपदासाठी विचार झाला असता, असा दावा करत त्यांनी राजकीय चर्चांना नवे वळण दिले.
नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की, शरद पवार हे देशातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी २०१४ किंवा २०१९ मध्ये एनडीएमध्ये प्रवेश केला असता, तर त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचाही विचार होऊ शकला असता. त्यावेळी आपण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एनडीएमध्ये विलय करण्याचाही सल्ला दिला होता, असे त्यांनी सांगितले.
आठवले यांनी पुढे म्हटले की, आजही शरद पवारांनी विकासाच्या मुद्द्यावर एनडीएमध्ये येण्यास कोणतीही अडचण नाही. एनडीएतील सर्व पक्ष विकासाच्या अजेंड्यावर एकत्र आले असून, पवारांनी निर्णय घेतल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्या पक्षाकडे सध्या आठ खासदार असल्याचा उल्लेख करत, ते एनडीएमध्ये आल्यास आघाडी आणखी मजबूत होईल, असे आठवले म्हणाले. “अजूनही वेळ गेलेली नाही. शरद पवारांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी एनडीएकडे आकर्षित होत असल्याचा दावा केला. अनेक खासदार विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत एनडीएमध्ये येत असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतही रामदास आठवले यांनी मोठे विधान केले. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन चळवळीत सहभागी व्हावे, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचीही आपली तयारी असल्याचे सांगत, भविष्यात ते सोबत आल्यास त्यांना मंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न करू, असे आठवले यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, शरद पवार यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post