मुंबई | राज्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन विविध भागांचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मंदिर परिसर आणि धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांनी जाणे टाळावे, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. राज्यातील अनेक ठिकाणी पूर, दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इतर दुर्घटनांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचेही त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी “आमचे आंदोलन मागे घेण्यासाठी ढगफुटीची अफवा पसरवण्यात आली,” असा आरोप केला होता. त्यावर उपरोधिक भाषेत उत्तर देताना महाजन म्हणाले, “हो, आम्हीच ढगफुटी केली. आम्हीच पाणी वरून खाली पाठवले. अशा वक्तव्यांची कीव वाटते. राज्यातील जनता संकटात असताना अशा प्रकारची विधाने करणे योग्य नाही. इतक्या कमी कालावधीत विक्रमी पाऊस झाला असून सहा ते सात जिल्हे जलमय झाले आहेत.”
दरम्यान, पूरग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान गिरीश महाजन यांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी चिखलात अडकली. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, स्वतः गाडीत बसून अवघ्या दोन-तीन मिनिटांत त्यांनी ती चिखलातून बाहेर काढली. “माझी गाडी अडकली नव्हती, मात्र पोलिसांची गाडी अडकल्यानंतर मी स्वतः मदत केली,” असे त्यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post