मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महायुतीत सहभागी होण्याच्या शक्यतेबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील आमदार आणि खासदारांची भूमिका जाणून घेण्याची जबाबदारी पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे. भाजपसोबत जाण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यात बैठक झाल्याची चर्चा आहे. एनडीएमध्ये सहभागी झाल्यास सत्तेतील वाटा आणि पुढील राजकीय समीकरणांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मात्र, या सर्व घडामोडींवर शरद पवार, जयंत पाटील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा होती. दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र आले असते तर ते एनडीए सोबत राहिले असते की इंडिया सोबत? हा प्रश्न अजित दादांच्या अपघाती निधनामुळे कायमचा अनुत्तरित राहिला आहे.















Discussion about this post