नाशिक । नाशिक जिल्ह्यावर अतिमुसळधार पावसाचे आणि संभाव्य ढगफुटीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच नदी-नाल्यांपासून दूर राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिक, पेठ, दिंडोरी, कळवण आणि सटाणा तालुक्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक शहराच्या पश्चिम भागात अतिवृष्टीसह ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन नियोजन अधिक कडक केले आहे. संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळण्याचा धोका आणि वाहतुकीवरील परिणाम लक्षात घेऊन विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संभाव्य धोका लक्षात घेता ७ जुलै रोजी नाशिक शहर वगळता नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळावे आणि नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या रस्त्यांची यादी तयार करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार हे मार्ग तात्पुरते बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय सुरू आहे.
दरम्यान, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सप्तशृंगी गडावरील दर्शन व्यवस्थाही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. संभाव्य पूरग्रस्त गावांची यादी तयार करून तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, हवामानातील बदल लक्षात घेता पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.















Discussion about this post