जळगाव । राज्यात गेले काही दिवस पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. आज रायगड जिल्ह्यासह नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागासाठी अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी काही तासांत अती मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आजपासून दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा भागात रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागांतही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी आजपासून पुढील दोन दिवसांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या पावसामुळे खरीप पेरणीला वेग मिळाला असून शेतकऱ्यांचे लक्ष आता दमदार पावसाकडे लागले आहे.















Discussion about this post