यवतमाळ | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या विमान प्रवासामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. शुक्रवारी दोन्ही नेत्यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान झालेल्या चर्चेबाबत बोलताना, “आमच्यात उच्च दर्जाची आणि उच्चस्तरीय चर्चा झाली असून, त्यात नेमकं काय ठरलं हे येत्या काही दिवसांत सर्वांना कळेल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यवतमाळ येथून शिवसेना (UBT) च्या दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.
‘गद्दारी करणाऱ्यांमुळे लाज वाटते’
उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि मशाल या चिन्हावर मतदारांनी उमेदवारांना निवडून दिले. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी गद्दारी केली. हे लोक इतकी वर्षे आपल्यासोबत कसे राहिले, याची आज लाज वाटते.” चुकीच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याबद्दल महाराष्ट्रभर फिरून मतदार आणि शिवसैनिकांची माफी मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘५० खोके’पासून ‘निधी’पर्यंत सवाल
आमदारांच्या बंडावेळी ‘५० खोके, एकदम ओके’ अशी चर्चा होती. आता खासदारांनी पक्ष सोडण्यामागे ‘निधी’ हे कारण असल्याचे स्वतःच सांगितले आहे. त्यामुळे “आमदारांना ५० कोटी मिळाले असतील, तर खासदारांना किती मिळाले?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिंदे गटाकडून “आता दौरा करून काही फायदा नाही” अशी टीका करण्यात आल्यानंतर ठाकरे म्हणाले, “मी दौरा केला म्हणूनच हे खासदार निवडून आले होते. त्यावेळी विरोधकांना घरी बसवले होते.” शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही, मात्र आमच्या भरोशावर निवडून आलेल्या खासदारांना गद्दारीसाठी भरघोस ‘हमीभाव’ मिळाला, असा टोला त्यांनी लगावला.















Discussion about this post