जळगाव/मुंबई । राज्यातील चातकासारखी वाट पाहणाऱ्या बळीराजाला आणि नागरिकांना दिलासा देणाऱ्या मान्सूनच्या प्रगतीला गेल्या दोन दिवसांपासून अचानक ब्रेक लागला आहे. महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास सध्या एकाच भागात थबकला असून, हवामान विभागाच्या (IMD) मते पुढील ३ दिवसांत तो राज्यातील इतर भाग व्यापण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज असून आज कोकण आणि विदर्भासह काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाच्या शक्यतेमुळे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मान्सूनची सीमा सध्या कुठे?
सोमवारी मान्सूनने वेगाने वाटचाल करत सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्हे पार केले होते. तसेच तो रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांपर्यंत पोहोचला होता. मात्र, त्यानंतर त्याचा वेग मंदावला आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळत असल्या तरी हा पाऊस सातत्यपूर्ण नसून वादळी किंवा पूर्वमोसमी स्वरूपाचा आहे. त्यामुळे राज्यातील मोठा भाग अद्यापही मुख्य मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे.
आज कुठे ‘यलो अलर्ट’ तर कुठे उकाडा?
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज विदर्भासह राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दुसरीकडे, पालघर जिल्ह्यात मात्र उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा (उकाडा) देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण राहील, परंतु उकाडा कायम राहणार असल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.
प्रगती मंदावण्याचे कारण काय?
हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात अनुकूल परिस्थिती असल्याने मान्सूनने संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये, सिक्कीम आणि पश्चिम बंगालचा हिमालयीन भाग वेगाने व्यापला आहे. मात्र, अरबी समुद्रात अनुकूल वातावरणाचा अभाव असल्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल मंदावली आहे.
पुढील ४ दिवसांत ‘या’ राज्यांमध्ये मान्सून सरकणार पुुढे
हवामान विभागाने दिलेल्या दिलासादायक माहितीनुसार, पुढील ३ ते ४ दिवसांत परिस्थिती बदलेल. मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचे उर्वरित भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, संपूर्ण तमिळनाडू, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल काळ निर्माण होत आहे.















Discussion about this post