मुंबई/नाशिक : नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढवणारे राजकीय नाट्य दिवसेंदिवस अधिकच रंगत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जवळ आली असतानाही काही बंडखोर उमेदवार माघार घेण्यास तयार नसल्याने महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही गीते बंधूंशी संवाद होऊ शकलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला भाजपकडून गणेश गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र महायुतीतील जागावाटपात नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. यानंतर राजकीय समीकरणे अचानक बदलली आणि भाजपचे गणेश गीते तसेच त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचे चित्र निर्माण झाले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याने महायुतीची अडचण आणखी वाढली आहे. दोन्ही गीते बंधूंची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही बंडखोरीचे सूर उमटले असून विष्णुपंत म्हैसधुने आणि गोरख बोडके यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे गणित अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी गणेश आणि गोकुळ गीते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र दोन्ही बंधू सध्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न अद्याप यशस्वी झालेले दिसत नाहीत.
तथापि, गोरख बोडके यांनी मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांची भेट घेत निवडणुकीतून माघार घेण्याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. या भेटीनंतर काही बंडखोर उमेदवार अखेर माघार घेतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीने नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार दिलेला नसल्याने त्यांच्या मतदारांचे मतदान कोणाच्या पारड्यात जाणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बंडखोरी, नाराजी आणि बदलती समीकरणे यामुळे नाशिक विधान परिषद निवडणूक सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे.















Discussion about this post