मुंबई । कडक उन्हाळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. सध्या मान्सून अत्यंत वेगात पुढे सरकत आहे. पुढील २४ तासांमध्ये तो केरळमध्ये धडकण्याची दाट शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या संदर्भात नवीन अंदाज जाहीर केलाय. त्यात मान्सूनच्या प्रवासाचा वेग आल्याचे स्पष्ट केले आहे.
मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. दरम्यान, राज्यात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
मुख्य मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचण्यापूर्वीच राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरातही पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिक उकाड्याने बेजार झाले होते. मात्र, आता मान्सून अगदी उंबरठ्यावर आल्यामुळे आणि राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा असल्याने वातावरणात मोठा गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवस मुंबई, पुण्यासह राज्यात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.















Discussion about this post