जळगाव । महाराष्ट्रात सध्या हवामानाची दोन अत्यंत टोकाची रूपे पाहायला मिळत आहेत. एकीकडे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र वाढत्या उष्णतेच्या प्रकोपाने होरपळत असताना, दुसरीकडे राज्याच्या काही भागांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील ४ आणि मराठवाड्यातील २ जिल्ह्यांना तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे, तर मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दुहेरी हवामानामुळे नागरिकांची मात्र चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली आहे. दरम्यान, मान्सून पुढील काही तासांत केरळमध्ये दाखल होणार असून लवकरच तो महाराष्ट्रात धडकणार असल्यामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी आज तीव्र उष्ण लाटेचा (Heat Wave) ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांत तापमानाने तब्बल ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. नागपूरमध्ये ४६.५° से., तर भंडारा आणि गडचिरोली येथे ४६.४° से. इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. अकोला आणि नागपूर जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’ कायम आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ब्रह्मपुरी’ हे शहर देशातीलच नव्हे, तर जागतिक स्तरावर सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक नोंदवले गेले आहे.
१० जिल्ह्यांत पावसाचा ‘यलो अलर्ट’
दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात नागरिकांना उष्ण व दमट हवामानाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे (Humidity) घामाच्या धारा सुटत असून उकाडा वाढला आहे. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आहे. या सर्व भागांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातही २७ मे पासून मान्सूनपूर्व सरी!
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा ४२ ते ४४ अंशांच्या आसपास असल्याने जळगावकर होरपळून निघाले आहेत. अशातच जळगावकरांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ मे पासून जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्यास सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आगामी काही दिवस जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर वातावरणात मोठे बदल पाहायला मिळतील. प्रामुख्याने सायंकाळच्या वेळी, म्हणजेच दुपारी ४ वाजेनंतर ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावेल. यामुळे जळगावकरांना तीव्र उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.















Discussion about this post