मुंबई । यंदाचा उन्हाळा चांगलाच त्रासदायक ठरला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेच्या तडाख्याने नागरिक होरपळून निघत आहे. वाढत्या तापमानाने जनजीवन विस्कळीत झाले असून यातच यंदा शाळा सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरवर्षी या शाळा १५ जून पर्यंत सुरु होतात, मात्र यावर्षी २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजण्याची शक्यता आहे. मंत्री पंकज भोयर यांनी याबाबत माहिती दिली आहे. वाढत्या उकाड्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
आज विदर्भाला रेड अलर्ट दिला असून पारा ४७ अंश पार गेला आहे. दरम्यान या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुट्टीत वाढ झाली आहे. मंत्री पंकज भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात सध्या तापमानाचा पार वाढला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. १० जूननंतरही विदर्भात उष्णतेची लाट कायम राहिल्यास शाळांच्या सुरूवातीची तारीख पुढे ढकलण्याचा विचार सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे १५ जूनला शाळा सुरू होण्याऐवजी यंदा त्या थेट २६ जूनपासून सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे.
या संदर्भात बोलताना पंकज भोयर यांनी सांगितले की, “तापमान दिवसेंदिवस वाढत आहे आणि नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच हा निर्णय घेतला जाईल. १० जूननंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येईल.” त्यांनी पुढे सांगितले की, शालेय शिक्षण विभाग लवकरच बैठक घेऊन या परिस्थितीचा सखोल अभ्यास करणार आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेचा परिणाम शिक्षणावर दिसून येत आहे. नागपूर विद्यापीठात होणाऱ्या सर्व परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना दुपारच्या प्रखर उन्हाचा सामना करावा लागू नये. तसेच, परीक्षा केंद्रांची संख्या वाढवून विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकूणच, विदर्भातील वाढते तापमान आणि उष्णतेची लाट लक्षात घेता प्रशासन सज्ज झाले असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देत निर्णय घेतले जात आहेत. काही दिवसांत परिस्थितीनुसार शाळा सुरू होण्याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post