जळगाव जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून महायुतीतच उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट दोघेही जागेवर दावा करत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाकडून त्यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे नाव पुढे करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ विधान परिषदेसाठी न राहता जिल्ह्यातील राजकीय ताकद आजमावण्याची संधी मानली जात आहे.
दुसरीकडे भाजपकडूनही अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अमोल शिंदे, रोहित निकम, डॉ. केतकी पाटील आणि नंदकुमार अडवाणी यांच्या नावांची चर्चा असली तरी भाजप ऐनवेळी चर्चेबाहेरील नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उमेदवारीच्या अंतिम क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहण्याची शक्यता आहे.
मतांच्या गणितात महायुतीची बाजू मजबूत मानली जात आहे. एकूण ५६४ मतदारांपैकी महायुतीकडे तब्बल ३८९ मतांचे संख्याबळ असल्याने विजयाचा मार्ग तुलनेने सोपा मानला जातो. तर महाविकास आघाडीकडे केवळ ७४ मते असून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. उर्वरित १०२ अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांच्या मतांमुळे राजकीय समीकरणांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका प्रलंबित असल्याने काही सदस्य मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीतील नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
या निवडणुकीसाठी १ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून १८ जून रोजी मतदान होणार आहे. २२ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जळगावच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. !















Discussion about this post