मुंबई । राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असतानाच, परभणी जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची तडकाफडकी उचलबांगडी करून त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची परभणी जिल्हाप्रमुखपदी नेमणूक केली होती. मात्र, ठाकरेंचा हा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न त्यांच्यावरच उलटला असून, आनेराव यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील तब्बल ८२ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत थेट पक्षप्रमुखांनाच आव्हान दिले आहे.
या संपूर्ण वादाची पाळेमुळे २५ एप्रिल रोजी मुंबईतील शिवसेना भवन येथे झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत आहेत. आगामी राजकीय गणितांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव आणि त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, काही उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांनी थेट दांडी मारली होती. खासदार आणि जिल्हाप्रमुखांच्या या अनुपस्थितीमुळे पक्षश्रेष्ठी कमालीचे नाराज झाले होते.
संजय जाधवांना रोखण्यासाठी कारवाई, पण…
खासदार संजय जाधव हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी आणि ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिस्तभंगाची कारवाई करत खासदार जाधवांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवले आणि तातडीने विष्णू मुरकुटे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे सोपवली.
८ दिवसांचा ‘अल्टिमेटम’; थेट सदस्यत्व सोडण्याचा इशारा!
उद्धव ठाकरेंच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर परभणीतील राजकारण प्रचंड तापले आहे. गंगाप्रसाद आनेराव यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या विविध आघाड्यांच्या, तालुका आणि शहर पातळीवरील ८२ पदाधिकाऱ्यांनी धडाधड आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे पक्षाकडे सुपूर्द केले आहेत.















Discussion about this post