जळगाव | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे पुढील काही तासांत हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
यामुळे तापी आणि पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांतील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात अथवा नदीकाठावर अनावश्यक वावर टाळण्याचे, जनावरे व शेतीची साधने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
धरणातील पाण्याची आवक आणि परिस्थिती लक्षात घेऊन विसर्गाचा निर्णय घेतला जाणार असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या हतनूर धरणात २११ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ४६.०८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.














Discussion about this post