मुंबई । महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर होताच राज्याच्या राजकारणात घडामोडीला वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या केवळ दोन जागांवरून आता शिंदे गटात अंतर्गत मतभेद आणि नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. उमेदवारीसाठी तब्बल आठ दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला झुकते माप देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आठ जणांची तगडी दावेदारी
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हे, रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत आणि बच्चू कडू या आठ जणांच्या नावांची प्राथमिक चर्चा सुरू आहे. यामध्ये सध्या उपसभापती पदावर असलेल्या नीलम गोऱ्हे आणि नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेले बच्चू कडू यांची नावे आघाडीवर मानली जात आहेत.
दरम्यान, पक्षातील या दोन्ही नावांवरून काही जुन्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षात आता ‘नव्या चेहऱ्यांना’ संधी मिळायला हवी, असा एक गट आग्रही आहे. विशेषतः बच्चू कडू यांच्या नावाला पक्षांतर्गत मोठा विरोध होताना दिसत आहे. कडू यांनी गेल्या काही काळात महायुती सरकारवर केलेली सडकून टीका आणि वेळोवेळी घेतलेली विरोधी भूमिका यामुळे शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत. पक्षफुटीच्या काळात त्यांनी केलेल्या काही विधानांमुळेही आमदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत प्रतिकूल मत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील असंतोष शमवणे आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन चालणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. बच्चू कडू यांना उमेदवारी देऊन त्यांच्या मित्रपक्षाची साथ कायम ठेवायची की, पक्षातील निष्ठावंतांना संधी देऊन नाराजी दूर करायची, अशा कात्रीत शिंदे सापडले आहेत.
एकूणच, विधान परिषदेच्या या निवडणुकीने शिंदे गटातील अंतर्गत खळबळ समोर आणली असून, आगामी काळात याचे परिणाम महायुतीच्या राजकारणावरही होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.















Discussion about this post