जळगाव: महाराष्ट्रात सध्या निसर्गाचे दोन वेगळे चेहरे पाहायला मिळत आहेत. एकीकडे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा बसत असताना, दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाने झोडपले आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा आणि पावसाचा असा ‘दुहेरी’ इशारा दिला आहे.
या ठिकाणी पावसाचा इशारा?
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वातावरणात अस्थिरता निर्माण झाल्याने विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच परभणी, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.
दरम्यान, मागील २४ तासांत राज्यातील तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. अमरावती येथे सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अकोला आणि वर्धा येथेही ४४ अंशांच्या आसपास तापमान राहिले.
जळगावकर होरपळले; पारा ४५ अंशांवर जाणार!
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. शुक्रवारी जळगावचे तापमान ४३.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र, जळगावकरांसाठी पुढचे दोन दिवस अधिक कठीण असणार आहेत. आगामी ४८ तासांत तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.















Discussion about this post