जळगाव । गावठी कट्टा हाताळत असताना अचानक गोळी सुटल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात घडली. अरुण सुरेश महाजन (वय ३५) असं मयत तरुणाचं नाव असून या घटनेनंतर परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून सखोल तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहिती अशी की, अरुण महाजन आपल्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्याशी छेडछाड करत असताना गोळी सुटली. गोळी थेट त्याच्या छातीत लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती समजताच रुग्णालयात नातेवाईक व स्थानिक नागरिकांची गर्दी उसळली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत शस्त्र आणि गोळीबाराच्या तांत्रिक बाबींची चौकशी सुरू केली. तसेच परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदविण्याचे कामही सुरु आहे.
अरुण महाजन हा मंडप व्यवसायाशी संबंधित होता आणि कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जात होता. त्यामुळे त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ आणि चिंता व्यक्त होत आहे.
पोलिस तपासात प्रमुख मुद्दा म्हणजे गावठी कट्टा अरुणकडे कसा आला? तो परवानाधारक होता का, किंवा कोणाकडून आणला होता का? ही गोळी अपघाती सुटली का, की यामागे काही इतर कारण आहे, याची चौकशी सुरू आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, शस्त्राचा उगम, वापर आणि संबंधित व्यक्तींची पार्श्वभूमी याची सखोल चौकशी केली जाणार आहे. आवश्यक असल्यास गुन्हा दाखल करण्याचीही शक्यता आहे. बेकायदेशीर शस्त्रांचा वाढता वापर हा नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला असून, शहरात या प्रकारावर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक तपासणीनंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.














Discussion about this post