भुसावळ । नुकतीच भारतीय रेल्वेने प्रवासी भाडेवाढ केल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत असताना रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सामान्य प्रवाशांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. रेल्वेने अनारक्षित म्हणजेच जनरल तिकिटांवर तीन टक्के सूट देण्याची घोषणा केली असून, या निर्णयाचा लाभ रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने रेलवनअधिकृत ॲपद्वारे बुक करण्यात येणाऱ्या अनारक्षित तिकिटांवर थेट तीन टक्के प्रवास भाडे सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच प्रवासी भाडेवाढ झाल्याने निर्माण झालेली नाराजी कमी करण्यासाठी हा दिलासादायक निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
ही सवलत मकर संक्रांतीपासून म्हणजेच 14 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही योजना पुढील सहा महिन्यांसाठी – 14 जुलै 2026 पर्यंत प्रभावी राहणार आहे.देशभरातील सर्व रेल्वे मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सवलतीचा लाभ मिळणार असून, ही सुविधा फक्त अधिकृत रेलवन ॲप वापरून तिकिट बुक केल्यासच उपलब्ध असेल.
या निर्णयामागे दोन प्रमुख उद्दिष्टे असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एक म्हणजे भाडेवाढीनंतर सामान्य प्रवाशांवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी करणे आणि दुसरे म्हणजे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत रेलवन ॲपचा वापर वाढवणे. तिकीट खिडकीवरील गर्दी कमी करणे आणि कॅशलेस व्यवहारांना चालना देणे, हाही या निर्णयाचा महत्त्वाचा हेतू आहे.















Discussion about this post