मुंबई । राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरु असून सोलापुरातील महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यादरम्यान, मनसे नते अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारसभांमधून वेळ काढत सरवदे कुटुंबियांची भेट घेण्याचे आवाहन केले होते. यानंतर आता अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे.
दरम्यान अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारण आणि सत्तेच्या स्पर्धेत कौटुंबिक आधार हिरावला जाऊ नये, अशी विनंती मनसेने या पत्रातून व्यक्त केली आहे. आता या संवेदनशील विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि सरवदे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्राद्वारे केलेल्या तीन मागण्या कोणत्या ?
मला राजकारण करायचं नाही, पण एक माणूस म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आणि आग्रहाची मागणी आहे की, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी: बाळासाहेबांच्या दोन्ही मुलींच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने उचलावी. या हत्येमुळे एका घराचा आधार हरपला आहे, तो आधार पुन्हा मिळवून देणे ही राज्याचे प्रमुख म्हणून आपली जबाबदारी आहे.
कठोरातील कठोर कारवाई: ज्यांनी हे क्रूर कृत्य केलं, त्यांना इतकी कडक शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची अशी हिम्मत होणार नाही. ही केवळ कायदेशीर कारवाई नसावी, तर तो त्या कुटुंबासाठी एक न्याय असावा.
निवडणूक नियमावलीत बदल: प्रचाराच्या नावाखाली असे जीव जाणं आता थांबलं पाहिजे. निवडणुकीच्या काळात होणाऱ्या प्रचार आणि राजकीय वादाचे रूपांतर अशा हिंसक घटनांमध्ये होऊ नये, यासाठी निवडणूक आचारसंहितेमध्ये कडक नियमांची अंमलबजावणी करावी, जेणेकरून उद्या पुन्हा कोणती आई किंवा पत्नी अशी उघड्यावर पडणार नाही. सत्ता मिळवण्यासाठी कुणाचे घर उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही.















Discussion about this post