मुंबई । महापालिका निवडणुकीपूर्वी ऑपरेशन लोटस यशस्वी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपलाच नवी मुंबईत मोठं खिंडार पडलं आहे. नवी मुंबईमधील भाजपच्या दोन दिग्गज महिला नेत्यांनी आपल्या ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यामुळे ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपसाठी सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे.
नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. कळंबोली परिसरातील भाजपच्या सक्रिय नेत्या गौरी कोरडे आणि यशोदा आलदर यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला. या दोन्ही महिला नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षात बुधवारी जाहीर प्रवेश केला. भाजपच्या वरिष्ठांकडून गोरगरीब जनतेची कामे होत नसल्याचा आरोप करत त्यांनी जवळपास ५०० कार्यकर्त्यांसह शेकापचा झेंडा हातामध्ये घेतला. या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गौरी कोरडे आणि यशोदा आलदर यांचा पक्षप्रवेश सोहळा शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना गौरी कोरडे आणि यशोदा आलदर यांनी सांगितले की, ‘स्थानिक पातळीवर जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून शेकापच्या माध्यमातून शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.’ या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात याचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.















Discussion about this post