जळगाव । जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने ८ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ६ जागांवर कब्जा मिळवत आपण कुठेच कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. त्याचे पडसाद जळगाव महापालिकेच्या निवडणुकीतही उमटण्याची चिन्हे दिसून आली आहेत.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत ७५ पैकी ५५ ते ६० जागा लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिलेल्या भाजपला वठणीवर आणण्यासाठी शिंदे गटानेही आता शड्डू ठोकल्याचे बोलले जात आहे. गेल्या वेळी महापालिकेत शिवसेनेचे २५ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले होते. आताही शिंदे गटाकडे किमान ३० उमेदवार जिंकण्याच्या क्षमतेचे आहेत. त्या हिशेबाने शिंदे गट इतके दिवस भाजपकडे जागा वाटपाची अपेक्षा व्यक्त करत होते.
भाजपने समाधानकारक तोडगा न काढल्यास नगर परिषदांच्या निवडणुकांप्रमाणे स्वबळावर लढण्याची थेट धमकी शिंदे गटाने भाजप नेत्यांना दिल्याचे सांगितले जाते. शिवसेनेच्या शिंदे गटाने नगर परिषदांच्या निवडणुकांप्रमाणे रणनीती आखून महापालिकेच्या सर्व ७५ जागा लढण्याचा निर्धार केल्यास भाजपसाठी ते मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने ठरवल्यास भाजपच्या नाकात दम येऊ शकतो. एकतर्फी निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणारे भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरू शकते.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरूवात झाली असली, तरी भाजप किंवा शिंदे गटाकडून अद्याप युती संदर्भात कोणतीच चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील युती जवळपास तुटल्यात जमा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. युती तुटल्यास महापालिका निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यातून जळगाव जिल्ह्यावर नेमक्या कोणत्या पक्षाचा आणि नेत्याचा दबदबा आहे, ते देखील सिद्ध होणार आहे.















Discussion about this post