नाशिक । राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला. यानंतर आता भाजपचे महापालिका निवडणुकीवर लक्ष आहे. आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये शहरातील भाजप आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. यादरम्यान गिरीश महाजन यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक विधान केले आहे.
‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर’ या प्रसिद्ध म्हणीत महाजन यांनी आता ‘इलेक्शन’ (निवडणूक) हा शब्द जोडला आहे. ‘प्रेम, युद्ध आणि निवडणुकीत सर्व काही चालतं,’ असे म्हणत त्यांनी महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणाचे अप्रत्यक्षपणे समर्थन केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये मित्रपक्षांमधील कार्यकर्ते एकमेकांकडे घेणार नाही, असा संकेत ठरला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याचे महाजन यांनी कबूल केले. ते म्हणाले, पक्षप्रवेशाची सुरुवात कोणीतरी एकाने केली की साखळी तयार होते. त्यांनी आमचा एक घेतला की आम्ही त्यांचे दोन घेतो आणि आम्ही दोन घेतले की ते तीन घेतात. सध्या हेच सत्र सुरू आहे. त्यांच्या या विधानाचा रोख थेट शिंदे गट आणि अजित पवार गटाकडे असल्याचे मानले जात आहे.
निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व मार्ग योग्य असल्याचे सांगत महाजन यांनी आगामी काळातही मित्रपक्षातील नाराजांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे ‘महायुती’मध्ये वरवर दिसणारी एकी असली तरी, ग्राउंड लेव्हलवर मात्र कार्यकर्त्यांच्या ओढाताणीवरून मोठ्या प्रमाणात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.















Discussion about this post