जळगाव : मागच्या काही काळात राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. यातच जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे भीषण चित्र समोर आले आहे.
2021 पासून 2025 सालाच्या एप्रिल अखेरपर्यंत एकूण 766 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 481 शेतकरी शासकीय मदतीस पात्र ठरले असून 289 अपात्र ठरविण्यात आले आहेत. तर 17 प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.
2025 च्या पहिल्या चार महिन्यांतच 77 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली असून त्यापैकी 29 पात्र, 31 अपात्र, तर 17 प्रकरणांची चौकशी सुरू आहे. फेब्रुवारीत 23 आणि मार्चमध्ये 29 जीवनयात्रा संपवल्याची नोंद आहे. मार्चमधील 10 प्रकरणे आणि एप्रिलमधील 7 प्रकरणे प्रलंबित आहेत.
अवकाळी पावसाचा फटका
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरिप हंगाम सुरू होण्यापूर्वीच आलेल्या पावसामुळे पेरणी लांबणीवर गेली असून, परिणामी आर्थिक ताण वाढला आहे. या प्रतिकूल परिस्थितीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना जीवनयात्रा संपवावे लागत असल्याचे भयावह चित्र समोर येत आहे.
Discussion about this post