मुंबई । राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यांनंतर आता उद्या २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणूक निकालाची उत्कंठा राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
आता नुकतंच विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावेळी उमेदवारांना निकालाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आहे.
यावेळी शरद पवारांनी महाविकासआघाडीला १५७ जागा मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच शरद पवारांनी सर्व उमेदवारांना निकालानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, अशीही सूचनाही दिली.
महायुतीकडूनही जोरदार मोर्चेबांधणी
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आपल्या एका विश्वासू नेत्यावर अपक्ष उमेदवारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी सोपवली आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून सरकार बनवण्याच्या तयारीत महायुती आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप नेते सक्रीय झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांनी पालघर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रिय केल्याची माहिती आहे. त्यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदार जमवाजमवीची जबाबदारी देण्यात आली आहे.















Discussion about this post