जळगाव । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात बी. टेकचं शिक्षण घेणाऱ्या अमरावती येथील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
प्रतीक विजयराव गोरडे (वय १९, रा. शिरसगाव कसबा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांचे वसतिगृह क्रमांक तीन येथे खोली क्रमांक टी ४४७ येथे प्रतीक गोरडे हा दोनच दिवसांपूर्वी राहायला आला होता. तसेच विद्यापीठात बी. टेक (प्लास्टिक) प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता.त्याच्या खोलीमध्ये पाच सहकारी होते. प्रतीक गोरडे याचे वडील शिरसगाव कसबा येथे मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, बुधवारी (ता.११) मुलांनी वसतिगृहात बसलेल्या गणपती मंडळातील आरती केली. त्यानंतर मुले जेवण्यासाठी निघून गेली.
काही वेळानंतर मुले जेवणावरून परतले. त्यावेळेला प्रतीक गोरडे याच्या खोलीमध्ये आतून दरवाजा लावलेला दिसून आला. काही तरुणांनी खिडकीची काच तोडून पाहिले तर प्रतीक याने गळफास घेतलेला होता. यावेळी विद्यार्थी धावून आले.त्यांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेत दाखल केले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. सारंग, सुरक्षा निरीक्षक यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयामध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली. घटनेची माहिती कळताच पाळधी दुरक्षेत्र पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णालयात येऊन विद्यार्थ्यांकडून आत्महत्याबाबत माहिती घेतली. दरम्यान, प्रतीक गोरडे यानी आत्महत्या का केली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.















Discussion about this post