जळगाव : सध्या जळगाव जिल्ह्यात विजांच्या गडगटासह जोरदार पाऊस झाला. याच दरम्यान, रावेर तालुक्यात दोधे या गावात वीज पडल्याने 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली आहे. जखमींना तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील दोधे गावात मंगळवार (दि.3) रोजी सकाळी वीज कोसळल्याने गावात राहणारे मीराबाई प्रताप जमरे (वय 30), पूजा प्रताप जमरे (वय 13), रेखाबाई खरते (वय 30), कालू खरते (वय 30) आणि ज्योती चंद्रसिंग रावत (वय 32) असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी असून उदरनिर्वाहासाठी रावेर तालुक्यातील दोधे येथे शेतीच्या कामासाठी आले होते.
प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post