मुंबई । वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे. 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात ही यात्रा चैत्यभूमीवरुन संपूर्ण राज्यभर काढण्यात येणार आहे.त्याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षण बचाव यात्रेमागील भूमिका मांडली.
काय म्हणाले आंबेडकर?
राज्यात ओबीसी आणि मराठा एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मात्र, अशावेळेस राजकीय पक्ष आणि नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. हे पक्ष जातींचे पक्ष आहेत, श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार पक्ष,काँग्रेस आणि अजित पवार यांचा पक्ष तर कायस्थ प्रभू म्हणजे भाजप व शिवसेना उबाठा यांचा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही उद्यापासून आरक्षण बचाव यात्रा काढत आहोत. चैत्यभूमीवरुन ही यात्रा सुरु होईल, मग पुण्यात फुले वाडा, नंतर अनेक जिल्हे करत पुढे औरंगाबाद येथे 7 ऑगस्ट रोजी यात्रेची सांगता होईल, असे आंबेडकर यांनी सांगितले. दरम्यान, अनेक ओबीसी संघटना, नेते, शरद पवार यांनीही यात्रेत यावं, असं आम्ही आमंत्रण दिलंय, निमंत्रण दिलंय. पण, त्यांनी कोणीही काही रिप्लाय दिला नाही. दुर्दैवाने फटका बसेल म्हणून राजकीय नेत्यांनी काही भूमिका घेतली नाही.
राज्यात सध्या ओबीसी घाबरलेला आहे, लहान ओबीसी कार्यकर्त्यावर हल्ला होत आहेत. त्यामुळे शांतता प्रस्थापित व्हावी हाच उद्देश यात्रेमागे आहे. ही गंभीर परिस्थिती आहे, जरांगे पाटील थेट त्यांना आरक्षण द्या, नाहीतर आरक्षण रद्द करा म्हणत आहेत. तसेच, 225 निवडून आणणार असं नेते म्हणतात. आपलं आरक्षण जाईल असं ओबीसींना वाटत आहे. त्यामुळे जिथं वाईट प्रकार झालाय, तिथं आळा घालण्याचं काम आम्ही करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.















Discussion about this post