तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यामधून धक्कादायक घटना समोर आलीय. विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झालं असून ६० हून अधिकजण गंभीर झाले आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना कल्लाकुरिची येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून २०० लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे.
तपासणीत दारूमध्ये घातक मिथेनॉल आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केला आहे. या घटनेत सहभागी असणारे आणि अवैध दारू निर्मिती रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी जीवितहानीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.
राज्यपाल रवी यांनी राजभवनच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सांगितलं की, कल्लाकुरिचीमध्ये अवैध दारू प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालंय.
या घटनेनंतर सरकारने कल्लाकुरिचीचे जिल्हा दंडाधिकारी श्रावण कुमार जटावथ यांची बदली केलीय. तर पोलीस अधीक्षक समय सिंह मीना यांना निलंबित करण्यात आलंय. कल्लाकुरिची जिल्ह्यातील दारूबंदी शाखेच्या पोलिसांसह इतर नऊ पोलिसांनाही निलंबित करण्यात आलंय.















Discussion about this post