मुंबई । राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले सध्या राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून पुढील ४ दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार, आजपासून (९ जून) मान्सूनचा प्रवास झपाट्याने होणार आहे. त्यामुळे राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा-विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर उद्या म्हणजेच सोमवारी कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची कामे लवकरात लवकर आटोपून घ्यावी.
मात्र, खरी हंगामाची पेरणी करताना घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. सध्या पुण्यात धुव्वाधार पाऊस सुरू असून मुंबईतही पावसाचं आगमन झालं आहे. येत्या काही तासांतच मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही आयएमडीकडून करण्यात आलंय.















Discussion about this post