जळगाव | शहरातील नाथवाडा परिसरातील सिंधी कॉलनी रस्त्यावर एका प्रौढाचा गळा चिरून खून झाल्याची घटना आज सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. ललित प्रल्हाद वाणी असं मयताचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत तपास सुरू केला आहे.
याबाबत असे की सुप्रीम कंपनीत काम करणारे ४५ वर्षीय ललित प्रल्हाद वाणी, नाथवाडा परिसरात राहत होते. रात्री ११.४५ वाजता कामावरून घरी परतत असताना त्यांचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर आढळला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतक ललित वाणी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यावर वार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी घटनास्थळी हजेरी लावली असून फॉरेन्सिक टीम नमुने गोळा करत आहे.
मृतकाचा खून का आणि कुणी केला याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. मृतकाची बॅग रस्त्याच्या कडेला सापडली आहे, त्यामुळे रस्तालूट करण्याच्या उद्देशाने हा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.















Discussion about this post