धरणगाव । धरणगाव तालुक्यातील पष्टाणे बुद्रुक येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सागर संतोष पाटील (वय ३२) असं मयत शेतकऱ्याच नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर पाटील हे नेहमीप्रमाणे आपल्या मालकीच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतात काम करत असताना, अचानक पाय घसरून किंवा अंदाज न आल्याने ते शेतातील विहिरीत पडले. विहिरीत पाणी असल्याने त्यांचा पाण्यात बुडून गुदमरून मृत्यू झाला.
ही घटना परिसरात उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सागर यांना विहिरीबाहेर काढून तातडीने उपचारासाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना दाखल करण्यापूर्वीच ‘मृत’ घोषित केले.
पोलीस ठाण्यात नोंद
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. धरणगाव पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची (AD) नोंद करण्यात आली आहे. सागर पाटील यांच्या अचानक जाण्याने पष्टाणे बुद्रुक गावातील तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांमधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत.














Discussion about this post