मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणारे अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा गंभीर विषय असून सर्व राजकीय पक्षांनी पक्षभेद बाजूला ठेवून या आंदोलनाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी एका महत्त्वाच्या विषयासाठी आलो आहे. ‘नीट’ पेपरफुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केल्या, मात्र सरकारचे याकडे लक्ष नाही. सरकार सध्या फक्त राजकारणात व्यस्त आहे.”
अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू केले असून, त्यांच्या या लढ्याला आपण पूर्ण पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचाही उल्लेख केला. “सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांनी देशहिताचे प्रश्न मांडले आहेत. अशा व्यक्तींचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्या सूचनांचा विचार व्हायला हवा,” असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, “२० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्याबाबत अभिजीत दीपके यांनी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.”
देशभरातील युवकांनी या आंदोलनात सहभागी होऊन आवाज उठवावा आणि सर्व राजकीय पक्षांनीही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.















Discussion about this post