नवी दिल्ली: लग्नाला अवघे ५ महिने पूर्ण होत नाही तोच संशयास्पद मृत्यू झालेल्या भोपाळमधील बहुचर्चित ‘ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणा’वर सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने देशातील सर्वच पालकांचे डोळे उघडणारी एक अत्यंत भावनिक आणि कठोर टिप्पणी केली. “मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी…” असे खडे बोल कोर्टाने सुनावणीदरम्यान सुनावले. ही टिप्पणी केवळ एका ट्विशा शर्मा प्रकरणापुरती मर्यादित नसून, देशातील प्रत्येक पालकांसाठी एक मोठा संदेश मानली जात आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचौली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मध्य प्रदेश सरकारची बाजू मांडण्यासाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता कोर्टात हजर होते, तर आरोपी सासरच्या मंडळींच्या वतीने वकील सिद्धार्थ दवे यांनी बाजू मांडली.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचौली यांच्या खंडपीठासमोर मध्य प्रदेश सरकारकडून एसजी तुषार मेहता हजर झाले होते. सुनावणी दरम्यान तुषार मेहता यांनी मृत ट्विशा शर्मा हिच्या कुटुंबीयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, त्यांनी आपल्या मुलीच्या तक्रारीवर वेळीच लक्ष देणे आवश्यक होते. पुढे तुषार मेहता यांनी सुनावणीदरम्यान असा युक्तिवाद केला की, ट्विशाची सासू आणि माजी जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंग यांनी टीव्ही चॅनलच्या मुलाखतीदरम्यान सुनेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच त्या तपासाला सहकार्य करत नाहीत.
सिद्धार्थ दवे यांनी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अंतर्गत नोंदवलेला संपूर्ण जबाब आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे आणि आरोप केले जात आहेत. ट्विशा शर्मा आणि समर्थ यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यासोबतच ट्विशा शर्माने आपल्या कुटुंबियांना समर्थ याच्याबद्दल केलेल्या तक्रारीचेही स्क्रीनशॉर्ट व्हायरल होत आहेत.















Discussion about this post