देशाच्या राजकारणात लवकरच राज्यसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असून, नोव्हेंबरमध्ये राज्यसभेतील १० खासदार निवृत्त होत आहेत. विशेष म्हणजे, यातील तब्बल ९ जागा या उत्तर प्रदेशातील असून, १ जागा उत्तराखंडमधील आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे या राज्यसभा निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांच्या चर्चा सुरू असतानाच या निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, जरी एनडीए (NDA) कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगाकडून अद्याप तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी, ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होण्याची चर्चा आहे.

सध्या राज्यसभेत एकूण २४३ सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे ११६, काँग्रेसचे ३०, तृणमूल काँग्रेसचे ९ आणि द्रमुकचे ८ खासदार आहेत. तसेच ७ खासदार हे राष्ट्रपतीनियुक्त असतात. एनडीएच्या संख्याबळाचा विचार केल्यास हा आकडा १५० च्या पुढे जातो, मात्र असे असले तरी एनडीए अद्याप दोन तृतीयांश बहुमतापासून दूर आहे. दुसरीकडे, ‘इंडिया’ (INDIA) आघाडीकडे सध्या ६४ खासदार आहेत.

कोणते खासदार होणार निवृत्त?
येत्या २५ नोव्हेंबर रोजी १० खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये भाजपचे ८, बहुजन समाज पक्षाचा १ आणि समाजवादी पक्षाचा १ खासदार समाविष्ट आहे. उत्तराखंडमधील नरेश बंसल यांच्याव्यतिरिक्त उर्वरित सर्व ९ खासदार हे उत्तर प्रदेशातील आहेत. यामध्ये भाजपचे बृजलाल, सीमा द्विवेदी, चंद्रप्रभा, हरदीप सिंह पुरी, नीरज शेखर, अरुण सिंह आणि बी.एल. वर्मा हे खासदार निवृत्त होत आहेत. तसेच, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव आणि बसपाचे रामजी यांचाही यात समावेश आहे.
उत्तर प्रदेशातील संख्याबळाचा फायदा कोणाला?
उत्तर प्रदेशातील विधानसभा संख्याबळात झालेल्या बदलांचा थेट परिणाम या राज्यसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समाजवादी पक्षाच्या आमदारांची संख्या वाढल्यामुळे या निवडणुकीत सपाला फायदा होऊ शकतो, तर दुसरीकडे भाजपच्या काही जागा कमी होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक चुरशीची ठरणार हे निश्चित मानले जात आहे.














Discussion about this post